रझा अकादमीची दंगल नियोजनबद्धच !

संपादकीय

महाराष्ट्रात हिंसाचार घडवून आणणा‍र्‍या रझा अकादमीवर बंदी घाला !

त्रिपुरा येथे मशिदी पाडल्याच्या अफवा पसरवून रझा अकादमीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. धर्मांधांनी काढलेल्या मोर्च्यात काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली, तर काही ठिकाणी दुकाने फोडण्यात आली. नांदेड येथे २, तर अमरावती येथील काही पोलीस यामध्ये घायाळ झाले. अशा प्रकारे अफवा पसरवून दंगल घडवण्याचा रझा अकादमीचा उद्योग नवीन नाही. यापूर्वी ११ ऑगस्ट २०१२ या दिवशी ‘बर्मा येथे ३० सहस्र मुसलमानांना मारले’, अशी अफवा पसरवून रझा अकादमीने आझाद मैदानात मोर्चा काढला. या मोर्च्यात पेट्रोल बाँब, सळ्या यांचा वापर करून हिंसा घडवली. पोलीस, पत्रकार यांना मारहाण करण्यात आली. महिला पोलिसांचे कपडे फाडण्यापर्यंत धर्मांधांची मजल गेली. सैनिकांच्या हौतात्म्याचे प्रतीक असलेल्या ‘अमर जवान स्मारका’ला लाथ मारून ते तोडण्यात आले. ही दंगल घडवणार्‍या रझा अकादमीने पुन्हा एकदा अशीच अफवा पसरवून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न केला. काही मासांपूर्वी फ्रान्स येथील चित्रकाराने महंमद पैगंबर यांचे चित्र काढले. फ्रान्समध्ये घडलेल्या या घटनेवरून मुंबईतील भेंडीबाजर येथील रस्त्यावर चिथावणीखोर ‘स्टीकर’ चिकटवण्यात आले होते. यामध्येही रझा अकादमीचाच हात होता. रझा अकादमीच्या या चिथावणीखोर कारवायांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महाराष्ट्रात काहीना काही कारणाने दंगल घडवण्याचा हा प्रयत्न आहे. रझा अकादमीची ही पार्श्वभूमी पहाता १२ नोव्हेंबरचा प्रकार निश्चितपणे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न होता.

१२ नोव्हेंबर या दिवशी रझा अकादमीने ‘#MumbaiBandh’ हा ‘हॅशटॅग’ वापरून ‘ट्वीट’ करून ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन केले. रझा अकादमीचे ‘जनरल सेक्रेटरी’ महंमद सईद नूरी यांनी ट्विटरवर ‘मुंबई बंद’चे आवाहन करणारे पत्रक ‘पोस्ट’ केले. त्यानंतर मुंबईतील ठिकठिकाणी मुसलमान बहुसंख्य असलेल्या भागांत बंद पाळण्यात आलेली छायाचित्रे पटापट ट्विटरवर प्रसारित करण्यात आली. त्यामध्ये ‘मुंबई बंद, मालवणी ओपन’ असे चिथावणीखोर संदेशही ट्विटरवर पाठवण्यात आले. यामुळे काही वेळातच संपूर्ण महाराष्ट्रात ही चिथावणी पोचली आणि शुक्रवारच्या नमाजाला एकवटलेले मुसलमान रस्त्यावर आले. मुसलमानांना चिथावून त्यांना रस्त्यावर उतरवण्यास सांगणारे हे कोण आहेत ?, याचा शोध पोलिसांनी घ्यावा. नांदेडसारख्या काही भागात मोर्च्यासाठी सभा घेण्यात आल्या आणि अधिक संख्येत उपस्थित रहाण्यासाठी आवाहन करण्यात आले. मशिदी पाडल्याचा तथाकथित बातम्या पसरवून नमाजानंतर मुसलमानांना मोर्चा काढण्याचे आवाहन करणे, त्यासाठी ट्विटरवर ‘ट्रेन्ड’ करणे, हा सर्व प्रकार नियोजनबद्धच आहे. यामागे कोण आहेत ? याचा शोध पोलिसांनी घ्यावा.

…अन्यथा पोलिसांवरील आक्रमणे चालूच रहातील !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

दळणवळण बंदीच्या कालावधीत वाहतूक पोलिसांवर आक्रमण झाल्याच्या अनेक घटना घडल्या. या घटनांमध्ये पोलिसांवर आक्रमण करणारे बहुतांश धर्मांधच होते. पोलिसांवर आक्रमण करण्याइतके धर्मांर्धांमध्ये धैर्य आले कुठून ? धर्मांधांना पोलिसांचे भय राहिले नाही का ? पोलिसांविषयी भय संपत चालल्याची या घटना लक्षणे आहेत. हे जर असेच चालू राहिले, तर पोलिसांवरील ही आक्रमणे कधीतरी थांबतील का ? अशी प्रत्येक घटना ही पोलिसांचे मनोधैर्य खच्चीकरण करणारी आहे. मोर्चा काढणे, निषेध करणे हे लोकशाहीत चालूच असते; मात्र महिला पोलिसांचे कपडे फाडणे, ‘अमर जवान स्मारका’ला लाथ मारणे, ही कृत्ये धर्मांधच करू शकतात. या धर्मांधांची नांगी त्याच वेळी ठेचली असती, तर महाराष्ट्रात पुन्हा ही पिळावळ वळवळीली नसती. पोलिसांना कारवाई करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य बहाल का केले जात नाही ? यामागे कुणाचे हितसंबंध आड येतात, हे पाहिले पाहिजे.

जी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हिंदुत्वनिष्ठांना प्रत्येक हिंसाचाराच्या घटनेनंतर आरोपीच्या पिंजर्‍यात उभी करते त्यांनी या घटनेचा निषेध का केला नाही ? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी १२ नोव्हेंबरच्या मोर्च्याला पाठिंबा दिला होता. या मंडळींना रझा अकादमीचा उघडउघड चालणारा राष्ट्रद्रोह कसा चालतो ? यांतील एकानेही रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केलेली नाही. ‘हिंदुत्वनिष्ठांनी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला की, राज्यघटनेची पायमल्ली झाल्याची बोंब ठोकायची आणि अल्पसंख्यांकांनी हिंसा केली की, जणू त्यांचे व्यक्तीस्वातंत्र्य असल्याप्रमाणे गप्प रहायचे, ही पुरोगाम्यांची दुटप्पी भूमिका आहे. हिंदुत्वनिष्ठांवर कारवाईची मागणी करणारे पुरोगामी जर रझा अकादमीच्या समाज आणि राष्ट्र द्रोही कृत्यांविषयी मूग गिळून गप्प रहात असतील, तर त्यांनी यापुढे राज्यघटनेच्या गप्पा तरी मारू नयेत.

…तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी ‘रझा अकादमी’ संपवू !

‘महाराष्ट्राच्या विविध भागांत हिंसा आणि दंगल उसळवण्याचा पाठीमागे अतिरेकी संघटना रझा अकादमी हीच आहे. सरकारने एकतर तिच्यावर बंदी घालावी, अन्यथा महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू, अशी चेतावणी भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी दिली आहे. नीतेश राणे यांची ही रोखठोक भूमिका निश्चितच कौतुकास्पद आणि हिंदूहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून देणारी आहे.

‘मुसलमानांचे लांगूलचालन करणे’ हाच पाया असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून ही अपेक्षा नाही; मात्र हिंदुत्वाचा पाया असलेल्या भाजप आणि शिवसेना यांनी रोखठोक भूमिका घ्यावी, हिंदूंना सुरक्षित वाटेल अशी परिस्थिती निर्माण करावी, ही हिंदूंची अपेक्षा आहे.