पणजी येथील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेले प्रश्न आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी दिलेली उत्तरे

हिंदूंनी यंदाची दिवाळी ‘हलालमुक्त’ साजरी करावी, याविषयीची पत्रकार परिषद !

पत्रकार परिषदेत बोलतांना श्री. रमेश शिंदे, शेजारी श्री. सत्यविजय नाईक

‘हिंदूंनी यंदा दिवाळीच्या काळात ‘हलालमुक्त दिवाळी’ या अभियानात सहभागी होऊन ‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर बहिष्कार घालावा’, असे आवाहन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने २७ ऑक्टोबर या दिवशी पणजी येथे पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी दिलेली उत्तरे येथे देत आहोत.

पत्रकार : हलाल सर्टिफिकेशनला कायद्याचे समर्थन आहे का ?

श्री. रमेश शिंदे : हलाल सर्टिफिकेशनला कायद्याचे समर्थन नाही. हलाल प्रमाणपत्र ‘हलाल इंडिया’, ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ सारख्या इस्लामी अशासकीय संस्था (एन्.जी.ओ.) देत असतात. धर्मनिरपेक्ष भारतात सरकारच्या ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ म्हणजे (FSSAI) आणि ‘अन्न आणि औषध प्रशासन’ (एफ्.डी.ए.) या संस्था प्रमाणपत्र देत असतात.

पत्रकार : सरकार हलाल प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेवर कारवाई का करत नाही ?

श्री. रमेश शिंदे : सरकारकडून अपेक्षा आहे की, त्यांनी यावर कारवाई करावी.

पत्रकार : हलाल प्रमाणपत्राचे सूत्र सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी हिंदु जनजागृती समिती काय प्रयत्न करणार आहे ?

श्री. रमेश शिंदे : प्रसारमाध्यमे, सामाजिक संकेतस्थळे, आंदोलने, परिसंवादांचे आयोजन करणे आदींच्या माध्यमातून हा विषय सर्वसामान्यांपर्यंत पोचवला जात आहे.

पत्रकार : सण-उत्सव आदींच्या वेळी प्रदूषणाचे सूत्र काढून केवळ हिंदूंनाच का लक्ष्य केले जाते ?

श्री. रमेश शिंदे : गणेशोत्सव कालावधीत शाडूच्या मातीच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याने पाण्याचे प्रदूषण होत नाही. विसर्जनपूर्व आणि विसर्जनानंतर ‘आयआयटी, मुंबई’ यांनी केलेल्या पाण्याच्या नमुना तपासला आहे अन् त्यामधून पाण्याचे प्रदूषण होत नसल्याचे सिद्ध झाले आहे. हिंदूंच्या विरोधात नियोजनबद्ध अपप्रचार केला जातो. वास्तविक प्रदूषण होत असल्याचे विज्ञानाच्या माध्यमातून सिद्ध करणे अपेक्षित होते.