हिंदूंनो, प्रत्येक दिवस हा विजयदिनच व्हायला हवा !

श्रीरामाने रावणाला मारले, तो दिवस म्हणजे दसरा ! असत्यावर सत्याचा विजयोत्सव म्हणजे दसरा ! येणार्‍या दीपावलीची चाहूल म्हणजे दसरा ! दसरा म्हणजेच विजयादशमी ! विजय मिळवणे किंवा शौर्य गाजवणे हे हिंदूंच्या रक्तातच आहे. त्यामुळे हिंदूंसाठी खरेतर प्रत्येक दिवस हा विजयदिनच असायला हवा; पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आज तसे होत नाही. अर्थात हे केवळ आजच नव्हे, तर स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे होऊन गेली, तरीही आपण वर्षातून केवळ एकदाच विजयोत्सव साजरा करतो. ही खेदाची गोष्ट आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वी अनेक क्रांतीकारक, स्वातंत्र्यवीर यांनी प्राणांचे बलीदान देत देशाला प्रत्येक दिवशी विजय मिळवून दिला. यात त्यांचा कुठेही स्वार्थ नव्हता. त्यामुळे ‘त्यांनी खर्‍या अर्थाने सीमोल्लंघन केले’, असे म्हणता येईल.

सध्याची राष्ट्राची स्थिती पहाता याच सीमोल्लंघनाची आज आवश्यकता आहे. हिंदु धर्मावर आघात करणार्‍यांच्या विरोधात संघटितपणे उभे रहाणे आणि ते आघात दूर करणे, हे खरे सीमोल्लंघन ! नक्षलवाद, फुटीरतावाद, आतंकवाद नष्ट करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होणे हे खरे सीमोल्लंघन ! पाकिस्तान, चीन या शत्रूराष्ट्रांसह तालिबानसारख्या आतंकवादाच्या भस्मासुराच्या विरोधात उभे ठाकणे हे सीमोल्लंघनच ठरेल ! अशा स्वरूपाच्या राष्ट्रद्वेषाच्या विरोधात विजय मिळवण्याची आज सर्वच हिंदूंना प्रतीक्षा आहे. हे शासनकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवे.

सौ. नम्रता दिवेकर

आज सर्वत्रचे हिंदू काही प्रमाणात संघटित होत आहेत. त्यामुळे धर्म आणि राष्ट्र यांवर होणार्‍या आघातांची तीव्रता थोडीशी का होईना; पण अल्प होत आहे. यातील काही उदाहरणांचा विचार करायचा झाल्यास ते समजणे सोयीचे जाईल. हिंदूंसाठी जीवघेणे संकट ठरणार्‍या ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आज कायदे केले जात आहेत. त्यामुळे ही समस्त हिंदूंसाठी दिलासादायक गोष्टच म्हणावी लागेल. ख्रिस्ती आणि धर्मांध यांच्याकडून हिंदूंवर केले जाणारे अत्याचार, तसेच धर्मांतराच्या काही घटनाही समाजासमोर येत आहेत. अन्य धर्मियांची हिंदुद्रोही बाजू उघड होत असल्याने त्याविरोधात सनदशीर मार्गाने आवाज उठवला जात आहे. ‘डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ अशा स्वरूपाच्या परिषदेचे आयोजन केल्यावर सर्वत्रच्या हिंदूंचे मोठ्या प्रमाणात संघटन झाले. येनकेनप्रकारेण हिंदू संघटित होणे ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. हिंदूंचे हेच संघटन हिंदूंना हिंदु राष्ट्राकडे नेत आहे. काही वर्षांपूर्वी ‘हिंदु राष्ट्र’ ही केवळ संकल्पना म्हणून उदयास आली होती; पण सध्याचे हिंदूंचे संघटन, त्यांचा प्रतिसाद पहाता हिंदु राष्ट्रापर्यंतची वाटचाल वेगाने होत आहे’, असे म्हणता येईल. त्यामुळे हिंदूंसाठी विजयदिन आता समीपच आला आहे.

‘प्रत्येक संकटावर विजय मिळवण्याची सर्व हिंदूंना सुबुद्धी होऊ दे, हिंदु धर्माला त्याचे पुनर्वैभव प्राप्त करता होण्यासाठी प्रयत्नरत रहाता येऊ दे’, ही आजच्या विजयादशमीच्या शुभदिनी श्रीरामाच्या चरणी प्रार्थना !

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.१०.२०२१)