बंदमुळे झालेली हानी सत्ताधार्‍यांच्या खिशातून भरून काढा ! – भातखळकर, आमदार, भाजप

अतुल भातखळकर

मुंबई – पोलीस संरक्षणात अनेक ठिकाणी खासगी वाहने, बेस्ट बस यांची तोडफोड झाली. पोलीस बळाचा वापर करून केलेल्या ११ ऑक्टोबरच्या ‘बंद’च्या काळात सर्वसामान्यांची झालेली हानी सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या खिशातून भरून काढावी, यासाठी आपण स्वतः उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे भाजपचे प्रभारी आणि कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार भातखळकर यांनी स्पष्ट केले.  पश्चिम उपनगरातील कांदिवली आणि मालाड येथील दुकानदारांना पोलिसांच्या साहाय्याने दमदाटी करून दुकाने बंद करण्यास सांगणार्‍या शिवसेनेचा प्रयत्न आमदार भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला.