शाळा चालू करण्याविषयीचा निर्णय श्री गणेशचतुर्थीनंतरच ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पणजी, २० ऑगस्ट (वार्ता.) – शाळा चालू करण्याविषयीचा निर्णय श्री गणेशचतुर्थीनंतरच घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना व्यवस्थापनाशी निगडित सुकाणू समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. सुकाणू समितीची पुढील बैठक १७ सप्टेंबर या दिवशी होणार आहे. सुकाणू समितीने महाविद्यालयांना १ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष वर्ग चालू करण्याची अनुमती दिली आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘गोवा शासन शाळेचे प्रत्यक्ष वर्ग १ ऑक्टोबरपासून चालू करण्याविषयीचा निर्णय श्री गणेशचतुर्थीनंतर घेणार आहे.’’ या बैठकीला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचीही उपस्थिती होती.