‘भावबळे आणा प्रभूला’, या उक्तीप्रमाणे आचरण करून जीवनात पदोपदी गुरुकृपेची अनुभूती घेणार्‍या पू. (सौ.) संगीता पाटील !

‘भावबळे आणा प्रभूला’, या उक्तीप्रमाणे आचरण करून जीवनात पदोपदी गुरुकृपेची अनुभूती घेणार्‍या पुणे येथील सनातनच्या ८५ व्या समष्टी संत पू. (सौ.) संगीता पाटील (वय ६२ वर्षे) !

२३ जुलै २०२१ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.

सनातनच्या ८५ व्या समष्टी संत पू. (सौ.) संगीता पाटील (वय ६२ वर्षे) यांचा साधनाप्रवास पहात आहोत. ३ जुलै २०२१ या दिवशी आपण पू. (सौ.) संगीता पाटील यांचे बालपण, शिक्षण आणि त्यांना आलेल्या अनुभूती पाहिल्या. आज आपण यापुढील भाग पाहूया.

(भाग २)

भाग १ पहाण्यासाठी येथे क्लिक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/491721.html


पू. (सौ.) संगीता पाटील

 

‘अतिशय खडतर बालपण असूनही साधनेवर श्रद्धा ठेवून साधना करणारे कुणी असू शकते, यावर विश्वास बसणे कठीण आहे ! पू. (सौ.) संगीता पाटील यांचे कौतुक करावे तेवढे अल्प !’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बालपणापासूनच कष्टप्रद जीवन जगणार्‍या पू. (सौ.) संगीता पाटील यांना त्यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले, तरीही त्यांची देवावरील श्रद्धा मुळीच ढळली नाही. लहानपणी अनेक मंदिरांत भावपूर्ण सेवा केल्याने त्यांची श्रद्धा वृद्धींगत झाली आणि देवावरील त्यांच्या अतूट श्रद्धेमुळे श्री गजानन महाराज आणि साईबाबा यांच्या कृपाप्रसादे त्यांना अनेक अनुभूतीही आल्या. नंतर सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावरही त्यांना पदोपदी गुरुकृपा अनुभवता आली. त्यांच्या भावबळामुळेच जीवनातील अत्यंत खडतर प्रसंगी, तसेच त्यांच्या साधनाप्रवासातही प्रभूला त्यांच्या समवेत यावे लागले. त्यांना डोळ्यांनी स्पष्ट दिसत नसूनही गुरुकार्याची तळमळ, भाव आणि गुरूंवरील अढळ श्रद्धा या गुणांच्या बळावर त्यांनी ‘संतपद’ प्राप्त केले. त्यांची गुरूंवरील अपार श्रद्धा आणि गुरुकार्याची तळमळ सर्वच साधकांना साधनेत प्रोत्साहन देणारी आहे.

३. बाबांची शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात पुजारी म्हणून नियुक्ती होणे

नंतर बाबांची शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात पुजारी म्हणून नियुक्ती झाली. आम्ही शिर्डी येथे रहायला आलो. या मंदिरातही मी स्वच्छता करणे, पूजेची उपकरणे धुणे इत्यादी सेवा करत होते. मी घरातील सर्व कामे पूर्वीप्रमाणे करायचे. आईचे मला त्रास देणे चालूच होते.

३ अ. शिर्डी येथील श्री साईबाबांच्या मंदिरात सेवा करतांना आलेल्या अनुभूती

३ अ १. बाबांनी सांभाळण्याची असमर्थता दर्शवल्यावर साईबाबांनी एका व्यक्तीच्या रूपात येऊन त्यांना ‘तू हिचे शेत घेतले आहेस, तर तू हिला सांभाळायला हवे’, असे सांगणे : आम्ही शिर्डी येथे रहायला आल्यावर बाबांनी मला सांभाळण्यास असमर्थता दर्शवली. तेव्हा अकस्मात् एक व्यक्ती आली. तिने बाबांना विचारले, ‘‘या मुलीच्या वडिलांच्या शेताचे तुम्ही काय केले ? तुम्ही हिचे सर्व घेऊन बसलात. आता तुम्हाला या मुलीला सांभाळता येत नाही ? मी हिच्या आई-बाबांना ओळखत होतो. तुम्ही आता तिचा सांभाळ करायला हवा.’’ नंतर ती व्यक्ती दिसेनाशी झाली. तेव्हा ‘साईबाबाच त्या व्यक्तीच्या रूपात तिथे आले होते’, असे मला जाणवले.

३ अ २. साईबाबांचे दर्शन होऊन त्यांनी मस्तकावर हात ठेवल्यामुळे चैतन्य मिळाल्याचे जाणवणे : एकदा साईबाबांच्या पादुकांची पालखी निघाली असता मला तेथे साईबाबा दिसले. ‘त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि मला चैतन्य दिले’, असे मला जाणवले.

३ अ ३. मुसळधार पाऊस चालू झाल्यावर एका महिलेसह झाडाखाली थांबून साईबाबांचा धावा करणे, तेव्हा अर्ध्या झाडावर वीज पडून झाडाचा तो भाग आणि ती महिला जळून खाक होणे; मात्र स्वतः वाचणे : एकदा पावसाळ्याच्या दिवसांत आईने मला बाजारातून २० किलो फुले आणायला सांगितली होती. त्या दिवशी सकाळी ११ वाजता मुसळधार पाऊस पडत होता. मी आणि ३० ते ४० वर्षे वय असलेली एक महिला फुले आणायला जात होतो. तेव्हा अकस्मात् विजा चमकायला लागल्यामुळे आम्ही दोघी एका झाडाखाली थांबलो. मी झाडाला पकडून ठेवले होते आणि साईबाबांचा धावा करत होते. तिही साईबाबांचा धावा करत होती. मी ज्या ठिकाणी थांबले होते, तो भाग सोडून उर्वरित अर्ध्या झाडावर वीज पडली. वीज पडलेल्या झाडाचा भाग आणि माझ्या समवेत असलेली ती महिला जळून खाक झाली अन् मी वाचले.

३ आ. बाबांनी सांभाळण्याची असमर्थता दर्शवत शेगावच्या मंदिराच्या तत्कालीन अध्यक्षाकडे सुपुर्द करणे : कालांतराने बाबांनी मला सांभाळण्याची असमर्थतता दर्शवली. त्यांनी मला शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिराचे तत्कालीन अध्यक्ष श्री. शंकर पाटील यांच्याकडे सुपुर्द केले.

४. वैवाहिक जीवन

४ अ. चांगले सासर लाभणे

श्री. शंकर पाटील यांनी माझ्या वयाच्या २६ व्या वर्षी माझे लग्न करून दिले. आमचे लग्न मंदिरातच झाले. माझ्या सासूबाई चांगल्या होत्या. माझे केस लांब होते. त्या माझे केस विंचरून द्यायच्या. सासरे वारकरी संप्रदायानुसार साधना करत. ते प्रतिदिन शिवलीलामृत वाचायचे. ते ‘शिवलीलामृत’ पोथी वाचत असतांनाच त्यांचा प्राण गेला.

४ आ. अल्पशा आजाराने लहान वयातच मुलगा निधन पावणे

एक वर्षाने मी यजमानांसमवेत पुण्याला रहायला आले. मला लग्नानंतर ३ – ४ वर्षांनी मुलगा झाला. तो ७ वर्षांचा असतांना अल्पशा आजाराने मरण पावला.

माझ्या जीवनात एवढे प्रतिकूल घडत असूनही माझ्या मनात देवाप्रती असलेला आदर आणि भाव मुळीच न्यून झाला नाही.

४ इ. विषमज्वर आणि न्यूमोनिया होणे, त्या आजारपणात दृष्टी जाणे आणि आधुनिक वैद्यांनी ‘शस्त्रकर्म करूनही दृष्टी येणार नाही’, असे सांगणे

मला विषमज्वर झाला आणि नंतर न्यूमोनिया झाला. या आजारपणात माझी दृष्टी गेली. मी पुण्यातील बर्‍याच आधुनिक वैद्यांकडे गेले. सर्वांनी ‘शस्त्रकर्म करूनही दृष्टी येणार नाही’, असे सांगितले. नंतर आम्ही दोघांनीही (मी आणि यजमान यांनीही) दृष्टी परत येण्याची आशा सोडली होती.

५. सनातन संस्थेशी संपर्क

५ अ. अर्पण मागण्यासाठी घरी आलेल्या सनातनच्या साधिकेला जवळ असलेला एक रुपया देणे

वर्ष २००० मध्ये एक दिवस सनातनची एक साधिका आमच्याकडे अर्पण मागायला आली होती. आमची आर्थिक स्थिती बिकटच होती. तेव्हा मी त्यांना माझ्याकडे असलेला एक रुपया दिला. त्या साधिकेने आम्हाला सत्संगात येण्यास सांगितले.

५ आ. कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप करण्यास आरंभ करणे

मी सत्संगात जायला लागल्यापासून तिथे सांगितल्याप्रमाणे कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप करणे चालू केले. आरंभी मी सत्संगात खाली मान घालून बसून केवळ श्रवणभक्ती करायचे.

५ इ. नामजपामुळे आतून आनंद मिळणे आणि डोळ्यांसमोर एका व्यक्तीची प्रतिमा दिसणे अन् नंतर ते परात्पर गुरुदेव डॉ. आठवले असल्याचे लक्षात येणे

सत्संगात गेल्यामुळे माझा नामजप चांगला होऊ लागला. तो करतांना मला आतून पुष्कळ आनंद मिळत होता. ‘मी पुष्कळ काहीतरी मिळवले’, असे मला वाटू लागले. त्या वेळी मला माझ्या डोळ्यांसमोर एका व्यक्तीची प्रतिमा दिसायची. नंतर माझ्या लक्षात आले, ‘ते गुरुदेव होते.’ नंतर मी हळूहळू कुणाचाही आधार न घेता एकटीच सत्संगाला जाऊ लागले.

५ ई. नामजप करू लागल्यावर गुरुदेवांच्या कृपेमुळे मला दृष्टी मिळणे

मी नामजप चालू केल्यापासून ३ मासांतच मला थोडे दिसायला लागले. प्रथम मला घरात लख्ख प्रकाश पडल्याचे दिसले आणि हळूहळू दिसू लागले. आधुनिक वैद्यांनी मला दृष्टी येणार नाही, असे सांगितले होते; परंतु गुरूंची कृपा आणि नामजप यांमुळे मला ही अनुभूती आली. तेव्हापासून मी नाम सोडलेच नाही. गुरुदेवांच्या कृपेमुळेच मला दृष्टी मिळाली.

५ उ. प्रतिदिन सकाळी रांगोळी काढतांना ‘परात्पर गुरुदेव आणि श्रीकृष्ण घरी येणार आहेत’, असा भाव असणे

आमचे घर चौथ्या मजल्यावर आहे. मी प्रतिदिन सकाळी तिसर्‍या माळ्याच्या पायर्‍यांपासून वर घराच्या दारापर्यंत रांगोळी काढते. रांगोळी काढतांना ‘प्रतिदिन आपल्या घरी परात्पर गुरुदेव आणि श्रीकृष्ण येतात. त्यांना चांगले वाटायला हवे’, असा माझा भाव असतो.

५ ऊ. गुरुदेवांच्या कृपेमुळे चालत जाऊन सेवा करू शकणे

गुरुदेवांनी माझ्याकडून सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे ५५ वर्गणीदार करणे, अशा सेवा करून घेतल्या. परिसरातील सगळ्या मंदिरांत ‘सनातन प्रभात’ नियतकालिक चालू झाले. त्यामुळे अनेक जण ते वाचू लागले. मी चालत जाऊन प्रत्येक व्यक्तीला अंक देत असे. मी घरातून निघण्यापूर्वीच देवाला प्रार्थना करते. त्यामुळे मला चालतांना अडचण येत नाही. मला डोळ्यांनी नीट दिसत नाही; परंतु वाटेत खड्डा असल्यास किंवा मागून गाडी येत असल्यास ‘बाजूला हो. इकडून जा’, असे मला कुणीतरी सांगत असल्याप्रमाणे आवाज ऐकू येतात. त्या वेळी गुरुदेवच माझी काळजी घेत असतात, असे मला जाणवते.

६. यजमानांना कंपनीत अपघात होणे

६ अ. अपघातामुळे यजमानांना घरीच थांबावे लागणे आणि उदरनिर्वाहासाठी स्वतः दुसर्‍यांच्या घरी पोळ्या अन् धुणी-भांडी करणे

१७ वर्षांपूर्वी म्हणजे अनुमाने वर्ष २००२ मध्ये माझ्या यजमानांचा आस्थापनात अपघात होऊन त्यांच्या दोन्ही हातांची बोटे गेली. त्यांच्या पायावर मोठी लोखंडी वस्तू पडल्याने पायाची नसही तुटली. तेव्हापासून यजमान घरीच असतात. मी उदरनिर्वाहासाठी दुसर्‍यांच्या घरी पोळ्या आणि धुणी-भांडी करत असे.

६ आ. यजमानांना रुग्णालयात शस्त्रकर्म करण्यासाठी भरती केल्यावर आलेल्या अनुभूती

यजमानांना पुण्यातील वानवडी येथील एका रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथील आधुनिक वैद्यांनी ‘यजमानांचे मोठे शस्त्रकर्म करावे लागेल’, असे सांगितले.

६ आ १. रात्री यजमानांना कापूर आणि अत्तर लावून दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक त्यांच्या अंगावर ठेवणे आणि सकाळी श्रीकृष्णाला त्यांची काळजी घ्यायला सांगून कामाला जाणे : मी रात्रभर यजमानांजवळ थांबत असे. दिवसा यजमानांच्या शेजारी श्रीकृष्णाचे चित्र ठेवून श्रीकृष्णाला त्यांना सांभाळायला सांगून मी कामाला जायचे. मी रात्री यजमानांना कापूर आणि अत्तर लावत असे, तसेच मी दैनिक ‘सनातन प्रभात’ त्यांच्या अंगावर ठेवत असे. हे पाहून तेथील आधुनिक वैद्य मला ओरडत असत, तरीही मी नेटाने हे उपाय करत असे.

६ आ २. आधुनिक वैद्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक वाचणे, नंतर त्यांनी त्यांच्या मुलीचे लग्न जुळत नसल्याचे सांगितल्यावर त्यांना कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप करायला सांगणे आणि त्यांनी नामजप चालू केल्यानंतर ८ दिवसांतच त्यांच्या मुलीचे लग्न जुळणे : एकदा एका दैनिक ‘सनातन प्रभात’च्या विशेषांकात कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप करण्याचे महत्त्व छापून आले होते. मी तो विशेषांक यजमानांच्या जवळ ठेवला होता. आधुनिक वैद्यांनी माझ्या नकळत तो अंक नेऊन वाचला. नंतर त्या आधुनिक वैद्यांनी मला त्यांची कौटुंबिक अडचण सांगितली. त्यांच्या एकुलत्या एक मुलीचे लग्न जुळत नव्हते. मी त्यांना कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप करायला सांगितला. त्या आधुनिक वैद्यांनी आणि त्यांच्या पत्नीने श्रद्धेने नामजप केला. त्यांनी नामजप चालू केल्यानंतर आठ दिवसांतच त्यांच्या मुलीचे लग्न जुळले.

६ आ ३. आधुनिक वैद्यांनी मला घरी नेऊन माझे आदरातिथ्य केले. त्यांनी आम्हा दोघांना ८ दिवस जेवणाचा डबा दिला.

६ आ ४. आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्माचे नाममात्र पैसे घेणे : त्या वेळी रुग्णालयातील उपचारांचे ५५ सहस्र रुपये इतके देयक झाले होते; पण त्या आधुनिक वैद्यांनी आमच्याकडून केवळ ३०० रुपये घेतले.

६ आ ५. आता ते आधुनिक वैद्य गुरुकार्यासाठी अर्पण देतात आणि सनातनची सात्त्विक उत्पादनेही घेतात.

७. आस्थापनात काम करतांना आलेली अनुभूती !

७ अ. सेवेमुळे आस्थापनात जाता न आले, तरी त्या मासाचेही पूर्ण वेतन मिळणे

मी मला दृष्टी आल्यानंतर १२ – १३ वर्षांपासून एका लहान आस्थापनात ‘हेल्पर’ म्हणून कामाला जाते. मला सेवेमुळे बर्‍याच वेळा आस्थापनात जायला उशीर होतो. कधी सनातनचे काही उपक्रम किंवा सत्संग असल्यास मला आस्थापनात जाताही येत नाही, तरीही मला त्या मासाचे पूर्ण वेतन मिळते. आस्थापनाचे मालक सांगतात, ‘‘तुम्ही देवाचे करता ना ! मग तुम्ही कधीही आस्थापनात या. तुम्हाला तुमचे पूर्ण वेतन मिळेल.’’

८. प.पू. भक्तराज महाराजांच्या संदर्भात आलेली अनुभूती

एकदा मी कामावरून घरी येत होते. मार्गात असतांना अचानक वीज खंडित झाली. मला जवळजवळ ४ कि.मी अंतर पायी जावे लागते. वीज गेल्यावर ‘आता अंधारात कसे जायचे ?’, असा मला प्रश्न पडला. मी गुरुदेवांना आळवीत जात होते. त्याच वेळी काळा कोट, धोतर आणि हातात काठी घेतलेले एक गृहस्थ काठी वाजवत माझ्यापर्यंत आले. त्यांनी मला ‘कुठे जायचे आहे ?’, असे विचारले आणि म्हणाले, ‘मलाही तिथेच जायचे आहे. चला माझ्यासमवेत.’ असे म्हणून त्यांनी मला घरापर्यंत पोचवले. तितक्यात वीज आली. मी त्यांना ‘घरी चला’, असे म्हणत मागे वळून पाहिले, तर मला मागे कुणीच दिसले नाही. ‘ते प.पू. भक्तराज महाराजच होते’, याची मला निश्चिती झाली.

हे सर्व गुरुमाऊलींच्या कृपेनेच घडले. अशा पुष्कळ प्रसंगांतून गुरुमाऊलींनी मला तारून नेले आहे. अनेक अनुभूती दिल्या आहेत. त्यासाठी ईश्वरचरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे.’

(क्रमश:)

– (पू.) सौ. संगीता पाटील, भोसरी, पुणे. (२४.३.२०१९)

सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी सर्व संतांनी स्वतःच्या संदर्भातील, तसेच वाचक अन् साधक यांनी संत आणि संतांच्या अनुभूतीच्या संदर्भातील लिखाण लवकरात लवकर पाठवावे !

‘सनातनच्या संतांच्या लिखाणातून सर्वांना आनंद मिळावा, तसेच त्यांच्या साधनाप्रवासातून सर्वांना शिकता यावे’, यासाठी सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व संतांनी स्वत:चे साधनापूर्व जीवन, साधनाप्रवास, त्यांनी साधक आणि जिज्ञासू यांना केलेले वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन इत्यादी सर्व लिखाण शक्य तितक्या लवकर पाठवावे (यापूर्वी जे लिखाण पाठवले असेल, ते कृपया पुन्हा पाठवू नये.), तसेच वाचक आणि साधक यांनी त्यांना संतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि संतांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पाठवाव्यात. लिखाण शक्यतो टंकलेखन करून पाठवावे.

लिखाण पाठवण्यासाठी संगणकीय पत्ता : sankalak.goa@gmail.com

पोस्टाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, २४/बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. ४०३४०१

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक