समुद्रात फेकल्या जाणार्‍या कचर्‍याविषयी मुंबई उच्च न्यायालय स्वत:हून याचिका प्रविष्ट करणार

मुंबई – ‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या वेळी मुंबईसह राज्यातील समुद्र किनार्‍यांवर मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता. त्यांची गंभीर नोंद घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने स्वत:हून याचिका प्रविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी मुंबई महानगरपालिका, राज्य आणि केंद्र सरकार यांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

‘तौक्ते’ चक्रीवादळामध्ये कोकण, रामबाग (अलिबाग), रायगड यांसह मुंबईच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात कचरा वाहून आला होता. याविषयीच्या बातम्या अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. याची न्यायालयाने स्वत:हून नोंद घेतली आहे. या पूर्वी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपिठा पुढे ही सुनावणी झाली होती. या कचर्‍यासमवेत अन्य कचरा रासायनिक प्रक्रियेविना समुद्रात जात असल्यामुळे समुद्रातील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. पावसाळा चालू झाल्यामुळे प्रदूषणाचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे या प्रश्नावर तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे.