गुरु-शिष्य परंपरेद्वारे पुन्हा एकदा धर्मसंस्थापनेचे कार्य करण्याची वेळ आली आहे ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेश, बिहार आणि ओडिशा या राज्यांतील धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ हिंदूसंघटन कार्यक्रमाचे आयोजन

पू. नीलेश सिंगबाळ

वाराणसी – भारताच्या गौरवशाली परंपरेमध्ये गुरु-शिष्य परंपरा ही सर्वश्रेष्ठ समजली जाते. धर्माला आलेल्या ग्लानीमुळे जेव्हा राष्ट्र आणि धर्म यांवर संकट आले, तेव्हा गुरु-शिष्य परंपरेने भगवान श्रीकृष्ण-अर्जुन, आर्य चाणक्य-चंद्रगुप्त मौर्य, समर्थ रामदास स्वामी-छत्रपती शिवाजी महाराज, श्रीरामकृष्ण परमहंस-स्वामी विवेकानंद अशा अनेक गुरु-शिष्यांनी अग्रणी भूमिका निभावून धर्मसंस्थापनेचे कार्य केले. आजही हिंदु धर्मावर लव्ह जिहाद, मंदिर सरकारीकरण, गोहत्या, साधू-संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांची हत्या, हिंदूंचा वंशविच्छेद अन् धर्मांतर अशा अनेक आघातांमुळे हिंदु धर्म संकटात आहे. अशा वेळी पुन्हा एकदा गुरु-शिष्य परंपरेने धर्मसंस्थापनेचे कार्य करण्याची वेळ आली आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच ‘ऑनलाईन हिंदूसंघटन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमाचा लाभ उत्तरप्रदेश, बिहार आणि ओडिशा या राज्यांतील अनेक धर्मप्रेमींनी घेतला.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अलौकिक कार्याचा परिचय करून दिला. समितीच्या कार्याचा परिचय समितीचे श्री. प्रकाश मालोंडकर यांनी, तर समितीचे श्री. राजन केसरी यांनी येणार्‍या गुरुपौर्णिमेपर्यंत आपण व्यष्टी आणि समष्टी स्तरावर कोणते प्रयत्न करू शकतो, याविषयी माहिती दिली. श्री. राकेश श्रीवास्तव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या वेळी उपस्थित धर्मप्रेमींनी धर्मशिक्षणवर्गामुळे त्यांना झालेले लाभ आणि आलेल्या अनुभूती यांविषयी सांगितले.