‘कोरोना’च्या वाढत्या संसर्गामुळे मृत्यूभय निर्माण झाल्यास त्यावर शारीरिक, मानसिक आणि नामजपादी उपाय करून मात करा !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना विनंती 

कोरोनारूपी आपत्काळासाठी मार्गदर्शक सदर !

‘सध्या भारतासह अन्य काही राष्ट्रांत ‘कोरोना’ या संसर्गजन्य विषाणूंचा संसर्ग झाला आहे. यामुळे सर्वत्रचे जनजीवन विस्कळीत होऊन सर्वसामान्य नागरिकांमध्ये भयप्रद वातावरण निर्माण झाले आहे. समाजात अनेकांच्या मनांत मृत्यूभय निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत ‘लहानसहान कारणांनी मन विचलित होणे, काळजी वाटणे, तसेच भीती वाटून अस्वस्थता येणे’, अशी मनाची स्थिती होते. शारीरिक, मानसिक आणि नामजपादी उपाय करून या परिस्थितीवर मात करून मन स्थिर ठेवणे शक्य आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी शारीरिक स्तरावर करावयाचे उपाय 

१ अ. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी शासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे

१ आ. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास त्वरित वैद्यकीय चिकित्सा करून औषधोपचार चालू करणे

१ इ. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वैद्यांनी सुचवलेली होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक औषधे, तसेच काढे घेणे

२. मनोबल वाढवण्यासाठी मानसिक स्तरावर करावयाचे उपाय

कोरोनामुळे उद्भवलेल्या सामाजिक परिस्थितीमुळे मृत्यूभय निर्माण झाल्यास त्या त्या प्रसंगी योग्य त्या स्वयंसूचना दिल्यास प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडण्यास आणि मनाची स्थिरता टिकवून ठेवण्यास साहाय्य होते. या दृष्टीने मनोबळ वाढवून स्थिर रहाण्यासाठी ‘अंतर्मनाला कोणत्या स्वयंसूचना देता येतील ?’, हे पुढे दिले आहे.

२ अ. अयोग्य विचार : ‘मला कोरोना विषाणूचा संसर्ग होईल’, या विचाराने भीती वाटणे

२ अ १. स्वयंसूचना : ज्या वेळी माझ्या मनात ‘मला कोरोना विषाणूचा संसर्ग होईल’, या विचाराने भीती निर्माण होईल, त्या वेळी ‘मी आवश्यक ती सर्व काळजी घेत आहे’, याची मला आठवण करून देईन आणि दिवसभरात अधिकाधिक वेळ नामजप अन् प्रार्थना करून मी सत्‌मध्ये राहीन.

२ आ. अयोग्य विचार : ‘मला कोरोना विषाणूची लागण झाल्यास माझा मृत्यू होईल’, अशी भीती वाटणे

२ आ १. स्वयंसूचना क्र. १ : ज्या वेळी माझ्या मनात ‘मला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास माझा मृत्यू होईल’, असा विचार येईल, त्या वेळी ‘या विषाणूंची लागण झालेल्या ८० टक्के रुग्णांमध्ये आजाराचे स्वरूप सौम्य असते’, याची मला जाणीव होऊन मी सकारात्मक राहीन आणि कुटुंबीय, हितचिंतक अन् सरकारी यंत्रणा यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून आरोग्याची योग्य ती काळजी घेईन.

२ आ १. स्वयंसूचना क्र. २ : ज्या वेळी माझ्या मनात ‘मला कोरोना विषाणूंची लागण झाल्यास माझा मृत्यू होईल’, असा विचार येईल, त्या वेळी ‘प्रत्येकाच्या मृत्यूची वेळ भगवंताने निश्‍चित केलेली असते. त्यामुळे कोरोनामुळेच नव्हे, तर मनुष्याला कोणत्याही कारणामुळे कधीही मृत्यू येऊ शकतो’, याची मला जाणीव होऊन मी मनुष्यजन्माचे सार्थक होण्यासाठी साधनेवर लक्ष केंद्रित करीन.

(टीप : वरील दोन सूचनांपैकी स्वत:च्या प्रकृतीसाठी अनुकुल होईल, अशी एक सूचना निवडून ती घ्यावी.)

२ इ. अयोग्य विचार : ‘अशा कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेले मनोबल माझ्यात नाही’, असे वाटून ताण येणे

२ इ १. स्वयंसूचना : ज्या वेळी ‘कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेले मनोबल माझ्यात नाही’, असे वाटून मला ताण येईल, त्या वेळी ‘दयाघन भगवंत चांगल्या आणि कटू अशा दोन्ही परिस्थितींमध्ये माझ्या समवेत आहे. प्रतिकूल परिस्थितीत मी काय करणे आवश्यक आहे ?’, ते सुचवून तोच माझे मनोबल वाढवणार आहे’, याची मला जाणीव होऊन मी भगवंतावर दृढ श्रद्धा ठेवीन.

२ ई. अयोग्य विचार : औषधोपचार करूनही मुलीची सर्दी / ताप उणावत नसल्याने तिची काळजी वाटणे

२ ई १. स्वयंसूचना : ज्या वेळी मुलीला बर्‍याच दिवसांपासून सर्दी / ताप असेल, त्या वेळी ‘प्रत्येक वेळी सर्दी / ताप हा कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे झालेला नसतो’, याची मला जाणीव होईल आणि देवावर श्रद्धा ठेवून मी आधुनिक वैद्यांनी सांगितल्यानुसार तिला औषधे देईन अन् तिची स्थिती वेळोवेळी त्यांना कळवीन.

३. स्वयंसूचना किती दिवस आणि किती वेळा द्यावी ?

वरीलपैकी ज्या अयोग्य विचारांचा ताण किंवा काळजी असेल, त्या विचारांवर १५ दिवस अथवा विचार न्यून होईपर्यंत संबंधित स्वयंसूचना द्यावी. या स्वयंसूचनांची दिवसभरात ५ अभ्याससत्रे करावीत. एका अभ्याससत्राच्या वेळी ५ वेळा एक स्वयंसूचना अंतर्मनाला द्यावी. वरीलप्रमाणे अन्य कोणत्या विचारांमुळे ताण, तणाव, काळजी आदी निर्माण होत असेल, तर त्यासाठीही स्वयंसूचना देऊ शकतो.

४. मन एकाग्र करून स्वयंसूचना सत्रे करा आणि अल्पावधीत मनातील अयोग्य विचार न्यून झाल्याचे अनुभवा !

मन एकाग्र करून स्वयंसूचनांची सत्रे केल्यास सूचनांचा अंतर्मनावर संस्कार होऊन ‘मनातील ताण अथवा काळजी यांचे विचार अल्पावधीत उणावतात’, असे अनेकांनी अनुभवले आहे. त्यामुळे मन एकाग्र करून स्वयंसूचना सत्रे करावीत. मनात येणार्‍या निरर्थक विचारांमुळे सत्र एकाग्रतेने होत नसल्यास थोड्या मोठ्या आवाजात (पुटपुटत) स्वयंसूचना सत्र करू शकतो किंवा कागदावर लिहिलेली स्वयंसूचना वाचू शकतो. यामुळे विचारांकडे लक्ष न जाता ते आपोआपच न्यून होतील आणि स्वयंसूचनेचे सत्र परिणामकारकरित्या होईल. मोठ्या आवाजात सत्र करतांना ‘इतरांना व्यत्यय येणार नाही’, याची काळजी घ्यावी.

(मनाच्या समस्या दूर करण्यासाठी ‘मनाला योग्य स्वयंसूचना देणे’, हा स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेचा एक भाग आहे. संपूर्ण स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेविषयीची माहिती सनातनची ग्रंथमालिका ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन (७ खंड)’ या ग्रंथांत दिली आहे.)

५. कोरोना महामारीपासून रक्षण व्हावे, यासाठी ईश्‍वरी बळ मिळण्याकरता आध्यात्मिक स्तरावर करावयाचे उपाय

५ अ. प्रतिकारक्षमता आणि आध्यात्मिक बळ वाढावे, यासाठी मंत्रजप करा ! : ‘या विषाणूंची लागण होऊ नये’, यासाठी वैद्यकीय उपचारांसमवेत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, तसेच स्वतःची प्रतिकारक्षमता आणि आध्यात्मिक बळ वाढावे, यासाठी मंत्र-उपायही करावेत. यासाठी महामारीच्या या काळात ‘श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री गुरुदेव दत्त – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करावा.

५ आ. आपत्काळातून तरून जाण्यासाठी साधनेला आरंभ करा आणि ती वाढवा ! : कोरोनाची महामारी ही एक झलक आहे. भावी आपत्काळात यापेक्षाही मोठ्या आपत्तींना सामोरे जावे लागणार आहे. अर्थात् आपत्ती कितीही मोठी असली, तरी ईशभक्तीच्या आधारे त्यातून तरून जाता येते, हा आदर्श भक्त प्रल्हादाच्या रूपाने आपल्या समोर आहे. त्यामुळे सर्वच आपत्तीतून तरून जाण्यासाठी साधना करणार्‍यांनी ती वाढवत न्यावी आणि न करणार्‍यांनी आज नव्हे, तर आताच साधना आरंभ करावी !

साधनेचे महत्त्व आणि साधना कशी करावी, हे जाणून घ्या ! यासाठी सनातनच्या ऑनलाईन ‘साधना संवाद’साठी नोंदणी करा !

https://events.hindujagruti.org/

‘सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत देवच आपले रक्षण करणार आहे’, अशी श्रद्धा ठेवून साधनेला आरंभ करा आणि ती वाढवा !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.६.२०२१)