हरिद्वार कुंभमेळ्यातून आलेल्या भाविकांना १४ दिवसांचे सक्तीचे गृह अलगीकरण ! – देहली सरकारचा आदेश

नवी देहली – देहली सरकारने ४ ते १७ एप्रिल या कालावधीत हरिद्वार कुंभमेळ्यात उपस्थित राहून परतलेल्या भाविकांना आणि साधूंना १४ दिवस सक्तीच्या गृह अलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असे न करणार्‍यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती देहली मुख्य सचिव विजय देव यांनी दिली.

कुंभमेळ्याला उपस्थित राहिल्याची माहिती संबंधितांनी स्वतःहून सरकारला द्यायची आहे. सरकारने जारी केलेल्या एका लिंकवर ही माहिती भरता येणार आहे. यासाठी २४ घंट्यांची मुदत देण्यात आल्याचेही देव यांनी स्पष्ट केले. १८ ते ३० एप्रिलपर्यंत कुंभला जाणार्‍या लोकांनी जाण्यापूर्वीच त्यांची माहिती देऊन जायचे आहे.