राजकीय पक्ष हिंदु राष्ट्र आणू शकत नसल्याने हिंदूंना संघटित होऊन हिंदु राष्ट्रासाठी कार्य करावे लागेल ! – शाम्भवी पिठाधिश्‍वर पू. स्वामी आनंद स्वरूप महाराज

पू. स्वामी आनंद स्वरूप महाराज (उजवीकडे ) यांची भेट घेताना श्री. सुनील घनवट

हरिद्वार – राजकीय पक्षांच्या माध्यमातून ‘हिंदु राष्ट्र’ येऊ शकत नसल्याने हिंदूंना संघटित होऊन ‘हिंदु राष्ट्रा’साठी कार्य करावे लागेल. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांसारख्या संस्थांनी संघटित होऊन कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे उद्गार येथील शाम्भवी पिठाधिश्‍वर पू. स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनी काढले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील कुंभमेळ्यामध्ये ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवले जात आहे. या संपर्क अभियानाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. श्री. घनवट यांनी पू. स्वामी आनंद स्वरूप महाराज यांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली, तसेच कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट देण्याचे निमंत्रणही त्यांना देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी श्री. संजीव पुंडिर आणि समितीचे श्री. हरिकृष्ण शर्मा उपस्थित होते.

पू. स्वामी आनंद स्वरूप महाराज पुढे म्हणाले की, देशात अनेक ठिकाणी असलेल्या मंदिरांचे सरकारीकरण करून तेथील संपत्तीची लूट केली जात आहे, तसेच मुसलमान आणि ख्रिस्ती यांना मंदिरांच्या संपत्तीचे वाटप केले जात आहे. येथील कुंभक्षेत्रात ‘हिंदु राष्ट्र जागृती’चे फलक लावण्यात आले आहेत, त्यालाही प्रशासनाचा विरोध होत आहे. हे फलक येथील कुंभमेळ्यात लावायचे नाही, तर अन्यत्र कुठे लावायचे ? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित करून प्रशासनाच्या या वर्तवणुकीवर महाराजांनी अप्रसन्नता व्यक्त केली.

पू. स्वामी आनंद स्वरूप महाराज यांचा परिचय…

शाम्भवी पिठाधिश्‍वर पू. स्वामी आनंद स्वरूप महाराज हे शंकराचार्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांचा बेंगळुरू येथे आश्रम आहे. ते अधिक काळ त्या आश्रमातच वास्तव्यास असतात. त्यांनी ‘हिंदु राष्ट्र’ निर्मितीच्या कार्याला जोडण्यासाठी हरिद्वार येथे विविध ठिकाणी फलक लावले आहेत.