चारचाकी गाडीमध्ये एकटे असतांनाही मास्क वापरणे बंधनकारक ! – देहली उच्च न्यायालयाचा आदेश

नवी देहली – चारचाकी वाहनातून एकट्याने प्रवास करत असतांनाही मास्क वापरणे बंधनकारक आहे, असा निर्णय देहली उच्च न्यायालयाने दिला आहे. ‘कोरोनाचा प्रसार रोखण्यात मास्क हे सुरक्षा कवचासारखे आहे. त्यामुळे कोट्यवधी लोकांचे जीव वाचले आहेत’, असे न्यायालयाने म्हटले. खासगी वाहनातून एकट्याने प्रवास करणार्‍यांनाही देहली सरकारने मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. मास्क नसल्यास ५०० रुपये दंड आकारण्याचा आदेश सरकारने काढला आहे. याविरोधात ४ याचिका उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आल्या होत्या. यावर झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने याचिककर्त्यांची कानउघाडणी केली.