यशस्वी समुद्री अभियंता बनण्यासाठी स्वभावदोष निर्मूलनाद्वारे व्यक्तिमत्त्व विकास आणि मनाच्या सकारात्मकतेसाठी नामजप करणे आवश्यक ! – गिरीश पुजारी, मुख्य समुद्री अभियंता

श्री. गिरीश पुजारी

कोचीन, ८ मार्च (वार्ता.) – व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू असले, तरीही मनाला सक्षम बनवण्याचे प्रयत्न करत स्वतःमध्ये सतत सकारात्मक पालट करणे आवश्यक आहे. मनाचे कार्य म्हणजे सतत विचार करणे हे असले, तरीही मानसशास्त्रातील सिद्धांतानुसार मनात सतत द्वंद्व चालूच असते आणि ७० टक्के विचार हे अनावश्यक अन् निरर्थक असतात. त्यामुळे यशस्वी समुद्री अभियंता बनण्यासाठी स्वभावदोष निर्मूलनाद्वारे व्यक्तिमत्त्व विकास आणि मनाच्या सकारात्मकतेसाठी नामजप करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन मुख्य समुद्री अभियंता श्री. गिरीश पुजारी यांनी केले. ते ‘एम्.टी. सक्सेस’, जहाजावरील यंत्र विभागातील प्रशिक्षणार्थी अभियंता यांच्यासाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षणवर्गात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.

श्री. गिरीश पुजारी पुढे म्हणाले, ‘‘मनात येणारे निरर्थक आणि नकारात्मक विचार ओळखून ते थांबवण्यासाठी, तसेच मनाची सकारात्मकता वाढवण्यासाठी आपल्या श्रद्धेनुसार नामजप करणे महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे शरीर सुदृढ करण्यासाठी व्यायाम करावा लागतो. त्याप्रमाणेच मनाला स्वयंसूचना देऊन सक्षम बनवण्याचे प्रयत्न करत रहावे लागतात. मनाला सक्षम बनवण्यासाठी कोणतीही गोळी अथवा उपचार उपलब्ध नसून मनाला शिस्त लावून स्वयंसूचना देणे क्रमप्राप्त ठरते.’’

क्षणचित्रे

१. मनाचे कार्य आणि व्यक्तिमत्त्वाचे प्रकार यांचे आकृतीबंध, तसेच वरील प्रशिक्षणाची संक्षिप्त संहिता प्रशिक्षणार्थी अभियंत्यांना उपलब्ध करून देण्यात आली.

२. www.ssrf.org या संकेतस्थळाची माहिती आणि अन्य उपलब्ध लेख यांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

 

श्री. गिरीश पुजारी