५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली रामनाथी, गोवा येथील चि. रुक्मिणी अविनाश जाधव (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. रुक्मिणी अविनाश जाधव एक आहे !

माघ कृष्ण पक्ष पंचमी (३.३.२०२१) या दिवशी चि. रुक्मिणी अविनाश जाधव हिचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

(गर्भारपणात प्रारंभी चि. रुक्मिणीची आई सौ. स्वानंदी देहली येथील सेवाकेंद्रात सेवारत होत्या.)

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ –  परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

(भाग १)

चि. रुक्मिणी जाधव

चि. रुक्मिणी जाधव हिला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. गर्भारपण

१ अ. १ ते २ मास

१ अ १. मासिक पाळी वेळेत न आल्याने त्यासाठी गोळ्या घेण्याचा विचार मनात येणे आणि त्या वेळी ‘आधुनिक वैद्यांशी बोलून घेऊया’, असे वाटल्यावर त्यांनी सांगितल्याप्रमाणे तपासणी केल्यावर गर्भधारणा झाल्याचे समजणे : ‘मला जुलै २०१९ मध्ये गर्भधारणा झाली. जुलै मासात माझी मासिक पाळी वेळेत आली नाही. मला मासिक पाळी अनियमित येण्याचा त्रास आहे. मला दीड मास मासिक पाळी न आल्याने त्यासाठी गोळ्या घेण्याचा विचार माझ्या मनात आला. तेव्हा त्यासाठी असलेल्या गोळ्या घेण्याच्या विचारांमध्ये असतांनाच मला आतून तीव्रतेने जाणवले, ‘एकदा आधुनिक वैद्यांशी बोलून घेऊया.’ त्याप्रमाणे मी त्यांच्याशी ही गोष्ट बोलल्यावर ‘त्यांनी गर्भधारणा झाली आहे का ?’, हे तपासून घेण्यास सांगितले. तपासणी केल्यावर गर्भधारणा झाल्याचे कळले. त्या वेळी ‘बाळाचा जन्म ईश्‍वरेच्छेने होत आहे’, याची मला तीव्रतेने जाणीव झाली.

१ अ २. गुरूंच्या कृपेने देहलीसारख्या नगरात अत्यल्प मूल्यात आणि आवश्यक त्याच तपासण्या करायला सांगणार्‍या आधुनिक वैद्या भेटणे : गर्भधारणा झाल्याचे लक्षात आल्यावर देहली सेवाकेंद्राच्या जवळ असलेल्या आधुनिक महिला वैद्यांकडे मी तपासणीसाठी जाऊ लागले. आज समाजातील आधुनिक वैद्य रुग्णाकडून पैसे उकळण्याच्या हेतूने विशेषतः गरोदरपणात विविध तपासण्या करायला सांगतात. रुग्णावर गोळ्या आणि औषधे यांचा भडीमार करतात; परंतु देवाच्या कृपेने या आधुनिक वैद्या निराळ्याच होत्या. त्यांनी मला अत्यल्प मूल्यात आणि आवश्यक त्याच तपासण्या करायला सांगितल्या. ‘देहलीसारख्या नगरात असे चांगले आधुनिक वैद्य मिळणे’, ही केवळ प.पू. गुरुमाऊलीचीच कृपा आहे. त्यामुळे गरोदरपणातील तपासणी आणि औषधोपचार इत्यादींसाठी अत्यल्प व्यय झाला.

१ आ. ३ ते ५ मास

१ आ १. देवतांची स्तोत्रे ऐकणे आणि नामजप करणे : या कालावधीत मला पहाटे ३.३० नंतर आपोआप जाग येत असे. जाग आल्यावर मनात तीव्रतेने ‘श्रीविष्णुसहस्रनाम’ ऐकावेसे वाटायचे. त्यानंतर ‘रामरक्षा स्तोत्र, मनाचे श्‍लोक, देवी कवच, शिव कवच, परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या चैतन्यमय वाणीतील मंत्र ऐकणे आणि नामजप करणे’, असे प्रयत्न आपोआपच होऊ लागले.

१ आ २. या कालावधीत ‘नामजप करतांना ‘गर्भात पुष्कळ चैतन्य असून हे चैतन्य माझ्या आत आणि बाहेरही अधिक प्रमाणात प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवायचे.

१ आ ३. ‘गर्भात केवळ नामजपाचे अस्तित्व आहे’, असे जाणवून माझा नामजप एकाग्रतेने आणि भावपूर्ण होत असे.

१ आ ४. या कालावधीत १ – २ वेळा अंथरुणावर आणि माझ्या पोटावरही दैवी कण आल्याचे माझ्या लक्षात आले.

१ आ ५. आधुनिक वैद्यांनी पूर्ण विश्रांती घेण्यास सांगणे; मात्र देवाच्या कृपेने या स्थितीतही शारीरिक सेवा करता येणे : तिसर्‍या मासात ‘सोनोग्राफी’ केल्यावर आधुनिक वैद्यांनी ‘गर्भाशयात काही अडथळा असल्याने प्रकृतीला पुष्कळ जपावे लागणार आहे’, असे मला सांगितले. या कालावधीत आधुनिक वैद्यांनी मला पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली होती; मात्र देवाच्या कृपेने या स्थितीतही माझ्याकडून शारीरिक सेवा झाली.

१ आ ६. गुरुकृपेने सेवेतील चैतन्याने गर्भाशयातील त्रास दूर झाल्याची आलेली अनुभूती : पाचव्या मासात पुन्हा ‘सोनोग्राफी’ केली. तेव्हा ‘गर्भाशयातील त्रास दूर झाला असून बाळाचे सर्व अहवाल समाधानकारक आहेत’, असे आधुनिक वैद्यांनी मला सांगितले. त्यांनी मला सांगितले, ‘‘तुम्हाला माझी किंवा इतर वैद्य आणि औषधे यांची आवश्यकता नाही. आता सात मास पूर्ण होईपर्यंत प्रवास करायला हरकत नाही.’’ प.पू. गुरुमाऊली गर्भातील बाळाचे पालनपोषण आणि अखंड रक्षण करत असल्याने सर्वकाही व्यवस्थित होत होते. सेवेतील चैतन्य आणि शक्ती यांमुळे आपोआप गर्भाशयातील त्रास न्यून झाल्याची मला अनुभूती आली. ‘गुरुमाऊलीच्या कृपेने त्यांच्या सेवेतून प्रारब्धातील अडथळे कसे दूर होतात ?’, हे मला प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळाले. त्यामुळे मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

१ इ. ६ ते ७ मास

१ इ १. दीपावलीच्या कालावधीत साधकसंख्या अल्प असल्याने आणि सेवाकेंद्राची वास्तू पालटायची असल्याने अनेक सेवा असणे आणि देवानेच त्या सर्व सेवा करवून घेणे : आधुनिक वैद्यांनी सर्व व्यवस्थित असल्याचे सांगितल्यावर मी अजून काही दिवस उपाय आणि सेवा या दृष्टीने देहली सेवाकेंद्रातच रहाण्याचा निर्णय घेतला. त्याच कालावधीत देहली सेवाकेंद्राची वास्तू पालटण्याचे नियोजन होते. दीपावली असल्याने काही साधक घरी गेले होते. त्यामुळे अल्प साधकसंख्येत ‘साहित्याचे वर्गीकरण करणे, त्याची बांधणी करणे, त्यावर साहित्याची नावे लिहिणे अन् त्या समवेत दिवाळीत सेवाकेंद्रात भेटायला येणार्‍या साधकांचे नियोजन करणे’, अशा बर्‍याच सेवा होत्या. या सर्व सेवाही देवानेच करवून घेतल्या.

१ इ २. ‘प्रसूतीसाठी घरी जाण्यापूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन व्हावे’, अशी इच्छा असणे आणि देवाच्या कृपेने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दर्शन होऊन ती इच्छा पूर्ण होणे : ‘प्रसूतीसाठी घरी जाण्यापूर्वी परात्पर गुरुदेवांचे दर्शन व्हावे’, अशी माझी इच्छा होती; परंतु ते शक्य नव्हते. काही दिवसांनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ कैलास-मानससरोवर यात्रेला जाण्यासाठी देहली येथे आल्याचे मला कळले. यात्रा करून परत आल्यावर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ अकस्मात् देहली सेवाकेंद्रात आल्या. त्या वेळी त्यांचे दर्शन होऊन देवाने माझ्या मनातील इच्छा पूर्ण केली. त्यांनी मला मानससरोवरातील तीर्थही प्राशन करण्यास दिले.

१ इ ३. ‘वाढदिवसाच्या दिवशी सेवाकेंद्रात देव डोहाळेजेवण करत आहे’, असा भाव ठेवणे आणि प्रत्यक्षातही सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांनी शुभेच्छा देऊन खाऊ देणे : नवरात्रातील अष्टमीला माझा तिथीनुसार वाढदिवस असतो. त्या वेळी मला ६ वा मास चालू होता. वाढदिवसाच्या दिवशी स्वतःचे आवरतांना माझ्या मनात विचार आले, ‘आज हिरव्या रंगाची साडी नेसूया. ‘वाढदिवसाच्या दिवशी सेवाकेंद्रात देव माझे डोहाळेजेवण करत आहे’, असा भाव ठेवूया. डोहाळेजेवणाच्या वेळी सुवासिनी गरोदर स्त्रीची ओटी भरून बाळासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद देतात. ‘वाढदिवसाच्या निमित्ताने सद्गुरु आणि साधक यांच्याकडून मला ज्या शुभेच्छा मिळतील, त्या आपण सूक्ष्मातून आपल्या पदरात घेऊया.’ त्या वेळी माझा कृतज्ञताभाव जागृत झाला. प्रत्यक्षातही त्या वेळी देहली सेवाकेंद्रात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका वास्तव्यास होते. त्यांनी सकाळी १० वाजता मला बोलावून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच मला तिखट आणि गोड खाऊ दिला. त्या वेळी त्यांनी मला सांगितले, ‘‘दोघांच्याही (स्वतःच्या आणि बाळाच्या) साधनेच्या दृष्टीने प्रयत्न करा आणि बाकी सर्व गुरूंवर सोपवा.’’

१ इ ४. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाकांनी महाप्रसादात आवडीचा पदार्थ बनवण्यास आणि महाप्रसादानंतर आईस्क्रीम देण्यास सांगणे अन् ‘देवाने जणू डोहाळेजेवण करून सद्गुरु आणि साधक यांची प्रीती अनुभवण्यास दिली’, असे वाटून कृतज्ञता वाटणे : दुपारच्या महाप्रसादातही सद्गुरु पिंगळेकाकांनी स्वयंपाकघरातील साधिकांना माझ्या आवडीचा पदार्थ बनवण्यास सांगितला. महाप्रसादापूर्वी साधकांनी बनवलेले शुभेच्छापत्र देऊन सद्गुरु पिंगळेकाका आणि सर्व साधक यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. महाप्रसादानंतर सद्गुरु पिंगळेकाकांनी मला आईस्क्रीम देण्यास सांगितले. डोहाळेजेवणाच्या वेळी घरातील मंडळी गर्भवती स्त्रीचे सर्व प्रकारचे डोहाळे पुरवतात, तसेच देवही माझ्या सर्व इच्छा पूर्ण करून मला सद्गुरूंची प्रीती आणि साधकांचा प्रेमभाव अनुभवण्यास देत होता. यासाठी मला देवाप्रती कृतज्ञता वाटत होती.

१ इ ५. सातव्या मासात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे सेवाकेंद्रात आगमन होणे आणि ‘त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य, शक्ती आणि प्रीती यांनीच देव ‘ओटीभरण’ करत आहे’, असे जाणवणे : हिंदु धर्मात गर्भवती स्त्रीची सातव्या मासात ओटी भरण्याची प्रथा आहे. देहली सेवाकेंद्रात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे आगमन झाले. त्या वेळी मला नुकताच सातवा मास लागला होता. तेव्हा ‘त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य, शक्ती आणि प्रीती यांनी देव माझे ‘ओटीभरण’ करत आहे’, या भावाने मला पुष्कळ कृतज्ञता वाटून पुनःपुन्हा माझी भावजागृती होत होती.

१ इ ६. गरोदरपणात सत्संगात आणि सेवेत रहाण्याची इच्छा पूर्ण होणे : ‘गरोदरपणात मला अखंड सेवेत आणि सत्संगात रहावे’, असे वाटायचे. त्याप्रमाणे मला सात मासांपर्यंत देहली सेवाकेंद्रात रहाण्याची संधी मिळाली. या कालावधीत मला सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाकांचा सत्संग सातत्याने मिळाला. त्याचप्रमाणे मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, पू. खेमकाभैय्या आणि पू. (सौ.) खेमकाभाभी यांचे चैतन्य ग्रहण करण्याची संधी कृपाळू गुरुमाऊलींनी दिली.

१ इ ७. जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

अ. या कालावधीत सेवा करतांना स्वतःचा विचार आणि कृती यांमध्ये आपोआप पालट होत असल्याचे लक्षात यायचे. ‘सेवा कुठलीही असो, ती भावपूर्ण आणि देवाला अपेक्षित अशी परिपूर्ण व्हायला हवी’, अशी तळमळ आतूनच वाटत असे.

आ. या कालावधीत कधी कधी झोपेतून उठल्यावर अथवा दुपारी विश्रांतीनंतर उठतांना मला माझे पोट एकदम हलके जाणवायचे. त्या वेळी ‘बाळाची ही निर्गुण अवस्था असावी’, असा विचार माझ्या मनात यायचा.’

(क्रमशः उद्याच्या अंकात)

– सौ. स्वानंदी अविनाश जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.७.२०२०)

भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/456118.html

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्या् या कणांचे ‘भाभा अॅंटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे ‘फॉर्म्युले’ सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक