महाराष्ट्रात मुसलमानांना आरक्षण लागू करण्यासाठी काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत ठराव

एकीकडे धर्मनिरपेक्षतेचा दिंडोरा पिटायचा आणि दुसरीकडे मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी आरक्षणाची मागणी करायची ! हिंदुहिताचा विषय आला की, भगवेकरणाची आरोळी ठोकायची आणि सर्वधर्मसमभावाच्या बुरख्याखाली मुसलमानांच्या मदरशांना अनुदान द्यायचे ! हिंदूंचा द्वेष आणि मुसलमानांचे लांगूलचालन हीच काँग्रेसची धर्मनिरपेक्षता आहे, असे म्हटल्यास चूक ते काय ?

मुंबई – महाराष्ट्रात मुसलमानांसाठी आरक्षण लागू करण्यात यावे, यासाठी काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत ठराव संमत करण्यात आला. ही बैठक २३ फेब्रुवारी या दिवशी पार पडली. या वेळी मराठा आरक्षणालाही पाठिंबा देण्यात आला.

१. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘राज्यातील सर्व समाजाच्या विकासासाठी कटीबद्ध असणे, हा महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम आहे. मुसलमान समाजाला आरक्षण लागू करणे, हा त्याचाच भाग आहे’, असे मत व्यक्त केले.

२. पक्षाच्या पुढील धोरणाविषयी माहिती देतांना काँग्रेसचे प्रदेश प्रभारी एच्.के. पाटील म्हणाले, ‘‘पक्ष संघटना बळकट करण्यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. एक दिवस शेतकर्‍यांसमवेत हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘संकल्प अभियान’ राबवले जाणार आहे. त्यासाठी ६ मासांचा कार्यक्रम अखिल भारतीय काँग्रेस समितीने दिला आहे. स्थानिक निवडणुकांविषयी स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घेतला जाईल.’’