कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऊसतोडणी कामगारांची उणीव असल्याने शेतकर्‍यांचा स्वतःच ऊसतोडणी करण्याचा निर्णय

वैभववाडी – असळज (तालुका गगनबावडा) येथे डॉ. डी. वाय. पाटील ऊस कारखाना निर्मितीनंतर जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी या दोन तालुक्यांमध्ये उसाचे क्षेत्र वाढले. सद्यःस्थितीत जिल्ह्यात सरासरी १ लाख टन उसाचे उत्पादन होते. यंदा कोरोनामुळे बीड, परभणी यांसह विविध भागांतून ऊसतोडणीसाठी येणारे कामगार अल्प आले आहेत. त्यामुळे तोडणीच्या समस्येला सर्वांनाच सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जैतापकरवाडी येथील ऊस उत्पादक शेतकरी प्रकाश जैतापकर, हरिश्‍चंद्र जैतापकर, विनोद जठार, यशवंत यादव, काशिराम यादव, तुळशीराम यादव, महेश यादव, अजित यादव, राजाराम यादव, संतोष यादव, हर्षदा जैतापकर, उर्मिला जैतापकर यांनी स्वतःची ऊसतोडणी स्वतः करायचा निर्धार केला.

प्रतिवर्षी ऊसतोडणी वेळेत व्हावी, यासाठी कारखान्याचे अधिकारी, कामगारांचे प्रमुख यांना वारंवार विनंती करावी लागते. बोली लावून अधिक रक्कम जो शेतकरी देतो, त्याची ऊस तोडणी वेळेत होते. त्यासाठी शेतकर्‍यांमध्ये चढाओढ असते. वेळेत ऊसतोडणी झाली नाही, तर उसाचे वजन अल्प भरते. त्यामुळे शेतकर्‍याची हानी होते. ‘वेळेत तोडणी झाल्यामुळे उसाचे वजन चांगले भरेल, तसेच कामगारांना देण्याचे पैसेही वाचतील’, असे हे शेतकरी म्हणाले.