१ जानेवारीपासून पंचायतींना समान ‘कॅडर’

पणजी, २७ डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील पंचायतींना १ जानेवारीपासून समान ‘कॅडर’ लागू केला जाणार आहे. यामुळे पंचायत संचालकांना एका पंचायत कार्यालयातील कर्मचार्‍याला दुसर्‍या पंचायत कार्यालयात स्थलांतर करणे शक्य होणार आहे. पंचायतींसाठी मार्च २०१९ मध्ये समान ‘कॅडर’ सिद्ध करण्यात आला होता आणि त्याची १ जानेवारी २०२१ पासून कार्यवाही करण्यात येणार आहे.

पंचायत संचालक कार्यालयातील सूत्रानुसार पंचायतीचे कारकून, चपरासी (प्यून) आदी कर्मचारी हे कामावर नेमणूक झाल्यापासून एकाच पंचायत कार्यालयात काम करत आहेत. समान ‘कॅडर’ लागू झाल्याने या कर्मचार्‍यांना एकाच क्षेत्रात किंवा अन्य क्षेत्रात स्थलांतर करणे शक्य होणार आहे. सर्व पंचायत कर्मचार्‍यांना हा स्थलांतराचा आदेश बंधनकारक असेल.