महाराष्ट्र सरकार सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांवर सूड उगवत आहे ! – आमदार नितेश राणे, भाजप

नितेश राणे

कणकवली – राज्यशासनाने ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यात ४७ सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे सांगितले आहे; मात्र त्यांपैकी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत एकाही रुपयाची गुंतवणूक नाही. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांवर सूड उगवत आहे, असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

कणकवली येथील प्रहार भवनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार राणे बोलत होते. या वेळी ते म्हणाले की,

१. कोकणात रायगड, ठाणे, पालघर, भिवंडी आदी ठिकाणी गुंतवणूक होत आहे. गेल्या एक वर्षात कोरोनाच्या आधी आणि नंतरही जिल्ह्यात प्रकल्प चालू करण्यासाठी राज्यशासनाने प्रयत्न केलेला नाही. ‘सी वर्ल्ड’, आडाळी एम्.आय्.डी.सी., नाणार रिफायनरी आदींसाठी नवीन एक रुपयाची गुंतवणूक नाही.

२. सिंधुदुर्ग जिल्हा वर्ष २०१४ पर्यंत दरडोई उत्पन्नामध्ये पाचव्या क्रमांकावर होता, त्याची आता घसरण होऊ लागली आहे. पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी कोणतेही पाऊल आघाडी सरकारने उचललेले नाही.

चिपी विमानतळ प्रकल्पात जिल्ह्याबाहेरील लोकांना नोकर्‍या करू देणार नाही !

चिपी विमानतळाच्या माध्यमातून निर्माण होणार्‍या नोकर्‍या जिल्ह्यातील लोकांनाच द्याव्यात. येथील लोकांना प्रशिक्षण द्या. आम्ही त्यासाठी सहकार्य करू; मात्र जिल्ह्याबाहेरच्या लोकांना येथे नोकर्‍या करू देणार नाही, अशी चेतावणीही आमदार राणे यांनी दिली आहे.