कोकण रेल्वेमार्गावर दिवाणखवटी (तालुका खेड) येथे अपघात : दुपारी ३ वाजल्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्ववत

८ घंटे वाहतूक ठप्प

खेड – कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटीहून रत्नागिरीकडे जाणार्‍या रेल्वेच्या देखभाल करणार्‍या गाडीची (मेन्टेनन्स व्हॅनची) मागील चाके रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक अनुमाने ८ घंटे ठप्प झाली होती. २० डिसेंबरला सकाळी ७ वाजता हा अपघात  तालुक्यातील वावे गावानजीक झाला. गाडीचे रुळ मार्गावर घेण्याचे काम युद्धपातळीवर चालू केले होते. या अपघातामुळे रुळाला तडे गेले होते. त्यामुळे तातडीने रुळ पालटण्याचे काम रेल्वे कर्मचार्‍यांनी चालू केले होते. सकाळच्या या घटनेमुळे वाहतूक खोळंबल्याने ‘तेजस एक्सप्रेस’ महाडजवळील वीर स्थानकात थांबवण्यात आली होती, तर नेत्रावती एक्सप्रेस आणि अन्य गाड्या चिपळूण अन् रत्नागिरी या स्थानकात थांबवण्यात आल्या होत्या. ८ घंट्यांनंतर दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनंतर हा रेल्वेमार्ग पूर्ववत चालू झाला.

ही घटना घडताच रेल्वेचे वरिष्ट अधिकारी घटनास्थळी पोचले. त्यांच्याकडून अपघाताचा हा प्रकार ‘वेल्डफेल्युअर’चा असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला.