इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परीक्षा अर्जामध्ये विद्यार्थ्यांच्या उल्लेखामध्ये ‘हिंदु’ धर्माचा पर्यायच नाही

अन्य सर्व पंथांचा उल्लेख; मात्र ‘हिंदु’ धर्मासाठी ‘अल्पसंख्यांक नसलेले’ असा उल्लेख करून हिंदु धर्माला डावलण्याचा प्रयत्नबहुसंख्य हिंदूंना डावलून त्यांचा ‘नॉन मायनॉरिटी’, असा उल्लेख करणार्‍या अधिकार्‍यांचा हिंदुद्वेष उघड होत आहे. या प्रकरणी शासनाने चौकशी करून दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, तसेच अर्जामध्ये ‘हिंदु’ धर्माचा उल्लेख करावा, अशी हिंदूंची मागणी आहे.

मुंबई, १० डिसेंबर (वार्ता.) – १० वी आणि  १२ वी च्या परीक्षा देण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी भरावयाच्या अर्जामध्ये मुसलमान, ख्रिस्ती, बौद्ध, शीख, पारशी आणि जैन या पंथांचा उल्लेख करण्यात आला आहे; मात्र हिंदु धर्माचा उल्लेख करण्यात आलेला नाही. या अर्जामध्ये ‘हिंदु’ असा उल्लेख न करता ‘हिंदु’ विद्यार्थ्यांसाठी ‘अल्पसंख्यांक नसलेले’ असा पर्याय देण्यात आला आहे. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हिंदूंना दुय्यम स्थान देऊन त्यांच्या मनातील धर्माविषयीची न्यूनगंड निर्माण करण्याचा, तसेच हिंदु धर्माविषयीची श्रद्धा न्यून करण्याचा हा डाव असल्याची शंका हिंदुत्वनिष्ठांकडून व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या या हिंदुविरोधी कृती हिंदुत्वनिष्ठांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अर्जामध्ये पर्याय देतांनाच ‘मायनॉरिटी रिलीजन’ हा शब्द ‘अल्पसंख्यांकांचा धर्म’ या अर्थाने वापरला आहे. बहुसंख्य हिंदूंना दुर्लक्षित करून अल्पसंख्यांकांना केंद्रबिंदू मानून हा अर्ज सिद्ध करण्यात आल्याचे यातून स्पष्ट दिसून येत आहे. प्रशासन सर्वधर्मसमभाव या तत्त्वावर चालत असतांना शिक्षण विभागाकडून हा भेदभाव का करण्यात आला आहे ? याविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची वर्गवारी समजण्यासाठी अशा प्रकारचा उल्लेख ! – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

केंद्रशासनाच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाने वर्ष २०१४ मध्ये धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची माहिती मागितली होती. विविध स्पर्धा परीक्षांतील सहभाग आणि शिष्यवृत्ती देण्यासाठी केंद्रशासनाला ही माहिती हवी असते. शिक्षण मंडळाकडे अशा प्रकारची माहिती उपलब्ध नसल्यामुळे ही माहिती मिळण्यासाठी अर्जामध्ये धार्मिक अल्पसंख्यांकांची वर्गवारी देण्यात आली. ‘परदेशातून आलेले विद्यार्थी किंवा ‘अ‍ॅग्लो इंडियन’ यांचा उल्लेख कुठे करायचा ?’, असा प्रश्‍न असल्यामुळे अर्जामध्ये ‘हिंदु’ असा उल्लेख करण्याऐवजी ‘नॉन मायनॉरिटी’ असा उल्लेख करण्यात आला. केवळ माहिती मिळण्याच्या उद्देशाने असे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र आदींवर असा उल्लेख करण्यात आलेला नाही. वर्ष २०१४ मध्ये अशा प्रकारे नमूद केलेला उल्लेख आतापर्यंत तसाच आहे. याविषयीचे पुढील धोरण अद्याप ठरलेले नाही, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली. (उल्लेख टाळण्याऐवजी हिंदु धर्माचा उल्लेख करून त्यामध्ये अन्य कुणाला समभाग अपेक्षित आहे, याची टीपही अर्जात देता आली असती. तसे न करता बहुसंख्य असलेल्या हिंदु धर्माला डावलून त्याऐवजी ‘नॉन मायनॉरिटी’ असा हेतुपुरस्सर केलेला उल्लेख यातून दिसून येतो. ज्या अधिकार्‍यांनी हे केले, त्यांचा हिंदुद्वेष यातून उघड होत आहे. शिक्षण मंडळाने अशा प्रकारे अल्पसंख्यांकांचा उल्लेख वगळण्याचे धाडस दाखवले असते का ? – संपादक)