देशभरात कोरोनाच्या संदर्भातील सरकारी कामात भ्रष्टाचार झाल्याच्या ४० सहस्र तक्रारी

काही दिवसांपूर्वीच एका संस्थेने देशातील भ्रष्टाचारात गेल्या वर्षभरात वाढ झाल्याचे म्हटले होते; मात्र ही वाढ होतांना कुठे भ्रष्टाचार झाला, हे स्पष्ट झाले नव्हते; मात्र आता ते स्पष्ट होत आहे. यातून कोरोनासारख्या संकटात भ्रष्ट भारतीय हे मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्यातही पुढे आहेत, हे लक्षात येते ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

प्रतिकात्मक चित्र (सौजन्य : latest news.com)

नवी देहली – कोरोनावर मात करण्याच्या कामामध्ये अनेक घोटाळे झाले आहेत. यासंदर्भात भ्रष्टाचाराच्या ४० सहस्र तक्रारी केंद्र सरकारकडे प्राप्त झाल्या आहेत. रुग्णालयांमध्ये अपुर्‍या सुविधा, पी.एम्. केअर फंडामध्ये निधी दान करण्यात येणारी अडचण, आवश्यक सुविधांची वानवा, साहाय्यासाठी परदेशातून आलेली विनंती, दळणवळण बंदीमुळे अडकून पडणे, छळवणूक, परीक्षा, अलगीकरण आदींविषयीच्या तक्रारी केंद्र सरकारच्या पोर्टलवर नोंदवण्यात आल्या. एप्रिल मासामध्ये सरकारने हे एक स्वतंत्र तक्रार निवारण पोर्टल बनवले होते. यावर सुमारे १ लाख ६७ सहस्र तक्रारी नोंदवल्या गेल्या. यांपैकी १ लाख ५० सहस्र तक्रारींचे निवारण करण्यात आले. ‘डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड पब्लिक ग्रिव्हिएन्सेस’ या संकेतस्थळावर याचा तपशील पहाता येऊ शकतो.

या तक्रारींपैकी कोरोनाच्या कामात झालेला भ्रष्टाचार आणि घोटाळे यांच्या तक्रारी वेगळ्या काढण्यात आल्या. त्यांचीच संख्या ४० सहस्र इतकी आहे. यामध्ये मंत्रालयांतील घोटाळे, लाचखोरी, निधीची भरपाई, तसेच सरकारी अधिकार्‍यांकडून केला गेलेला छळ, अशा तक्रारींचा समावेश आहे.