किती मुसलमान तरुणी हिंदु तरुणांशी विवाह करतात ! – रामेश्‍वर शर्मा, हंगामी  अध्यक्ष, विधानसभा, मध्यप्रदेश

मध्यप्रदेशच्या विधानसभेचे हंगामी अध्यक्ष रामेश्‍वर शर्मा

भोपाळ (मध्यप्रदेश) – पाकिस्तान आणि आय.एस्.आय.चे हस्तक ‘सीते’ला ‘रुबिया’ बनवण्याचा कट रचत आले आहेत. आम्ही कधीपर्यंत सीतेला रुबिया बनू देणार आहोत ? कधीपर्यंत सीतेला मरू देणार आहोत ? मला नर्गिस आणि सुनील दत्त यांच्या प्रमाणे खरे प्रेम दाखवा. किती नर्गिसने (मुसलमान तरुणीने) सुनील दत्तसमवेत (हिंदु तरुणासमवेत) विवाह केला आहे ?, असे प्रश्‍न मध्यप्रदेशच्या विधानसभेचे हंगामी अध्यक्ष रामेश्‍वर शर्मा यांनी राज्यात आणण्यात येणार्‍या ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्यावर बोलतांना केले. तसेच त्यांनी लव्ह जिहादसाठी मिळणार्‍या ५ वर्षांच्या शिक्षेत वाढ करण्याचीही मागणी केली.

रामेश्‍वर शर्मा यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलतांना म्हटले होते की, लव्ह जिहाद कायद्याच्या अंतर्गत अपहरण, बलात्कार, हत्या, घाबरवणे, धमकावणे आदींच्या संदर्भातील कलमेही जोडण्यात येणार आहेत. तसेच आमचा विचार आहे की, अनुसूचित जाती आणि जमाती यांतील तरुणी धर्मांतर करून मुसलमान किंवा ख्रिस्ती यांच्याशी विवाह करतात, तेव्हा त्यांना मिळणारे आरक्षणाचे लाभही रहित झाले पाहिजेत, यासाठी प्रयत्न करणार आहोंत. कारण ती तरुणी हिंदूही रहात नाही आणि अनुसूचित जाती अन् जमाती यांमधीलही रहात नाही.